Showing posts with label देशाटन. Show all posts
Showing posts with label देशाटन. Show all posts

Sunday, February 9, 2014

Back to Blog...

It has been really long, since I wrote...Dec-Jan is generally the most inspiring month for me (& probably for many young academicians like me) as it's a conference season. That's why, this blog also started in January, when I was overwhelmed by one such motivating experience. This year-end & New-year was no exception. It started with the alumni meet at our Department, where we actually got to meet many alumni about whom we had heard a lot; from our seniors as well as teachers. It was more like a family reunion for our ilk. Then came the conference to mark International Year of Statistics & Diamond Jubilee of our Department. Listening about Huzurbazar, Fisher and many more like them was really an interesting experience. 

Aurangabad Caves
After a while, we went for a conference at my Hometown. Visiting Aurangabad Caves, Panchakki after about 12-13 years was a refreshing experience. I had almost forgotten the beauty of these places. Getting to meet some old & new conference pals was as expected a nice experience. 

Then came a trip to Hyderabad, which was an unforgettable journey as we got to meet a living legend in Statistics, Prof. C. R. Rao. We got to talk to him and got a signed copy of his autobiography. This was really enthralling. The gallery at the C R Rao Institute was also worth visiting. We also got to meet some non-statisticians doing great work in Statistics. Getting to see the museums at Hyderabad was a pleasing by-product.

The latest in this series was a trip to Nashik for a national workshop. The journey to Nashik and the stay there were both amazing as I got to listen to many amusing anecdotes related to Statistics and Statisticians. It was really illuminating to see how even simple statistical tools can help us in real life.

Getting to meet so many great people has lengthened my wish-list. Let's see how many of them, I can  fulfill...


PS: Special thanks to Deep & Richa for their great company and lovely snaps...

Friday, April 1, 2011

केल्याने देशाटन - ३ ...


आजपर्यंत बोललो, ते आदर्शांबद्दल ... आज थोडं आपल्यासारख्यांकडून घेता येणाऱ्या गोष्टींबद्दल... 
गोव्यात जसा समुद्र पहिला, तशीच  आम्ही "मातृछाया " आणि "स्नेहमंदिर" या समाजमन्दिरांनाही भेट दिली. मातृछायातली निरागस मुलं आजही आठवतायत. स्नेहमन्दिरामधल्या आजी-आजोबांशी बोलताना जे समाधान मिळालं, ते अगदीच अवर्णनीय होतं. बा. भ. बोरकरांनी एका कवितेत म्हटलंय- 
" देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके , चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे " 
अशी अनेक तृप्त जीवनं तिथे पाहायला मिळाली. त्यांच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी ऐकताना जीवनाचे अनेक पैलू नव्यानं उलगडले गेले.


असंच, जीवनाचं एक नवं रूप बघायला मिळालं, ते जव्हार-देवबांधच्या आदिवासी वस्त्यांवर. जेव्हा  सूर्यमाळच्या पठारावर आमची गाडी थांबली, तेव्हा एस. टी. बघायला गोळा झालेली मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं अप्रूप अजूनही डोळ्यांपुढे येतंय. एस. टी. बघून त्यांना झालेला आनंद पाहिला आणि मग आपण किती सुखी आयुष्य जगतो याचा प्रत्यय आला. "मला लाल डब्यानं जायला नाही आवडत, व्होल्वोनी जाऊ किंवा आपली कार नेऊ ", अशी फर्माईश करणाऱ्यांना, लाल डब्यात बसणं तर सोडाच, पण लाल डबा बघायला मिळणंच, काहींसाठी इतकं महद्भाग्य ठरतं हे कळलं, तेव्हा मिळालेलं शहाणपण हे बाकी कोणत्याही शाळा-कॉलेजच्या शिक्षणानं आलं नसतं.
"I had the blues, as I had no shoes, 
until upon the street, I met a man who had no feet." 
अशाच प्रकारची काहीशी आमची परिस्थिती होती. पुस्तकात, वर्तमानपत्रात वाचलेलं 'कुपोषण', तिथल्या मुलांमध्ये प्रत्यक्षात पाहिलं आणि मग आपले जेवतानाचे नखरे कमी करायला हवेत, हे मनोमन पटलं. आजही पानात काही शिल्लक उरेल असं वाटत असतानाच, त्या मुलांचे चेहेरे आठवतात आणि मग आपोआपच नावडते पदार्थदेखील संपवले जातात. दुरून , उन्हात अनवाणी पायांनी पाण्याचे हंडे भरून घेऊन येणाऱ्या छोट्या छोट्या मुली पाहिल्या आणि पाण्याचंही जीवनमूल्य पटलं. अशा परिस्थितीत जगत  असतानाही त्यांनी आनंदानं केलेली नृत्यं पाहिली आणि मग जाणवलं की सुख-समाधान हे बाह्य परिस्थितीवर नव्हे तर मनस्थितीवर अवलंबून असतं.

आणि हो, हे सारं आपण ज्यांच्यासोबत अनुभवतो, त्या सहप्रवाशांकडूनही खूप काही शिकायला मिळतं बरं का... घरात आपल्या सख्ख्या बहीण-भावांशी भांडणारेही तिथे आपलं आवरून झालं की अगदी उत्साहात  एखाद्या छोट्या दोस्ताची bag भरून द्यायला मदत करतात.  मोठ्या ताई-दादांना काम करताना पाहून, "काकू मी नाश्त्याच्या प्लेट्स गोळा करू का ?", असं स्वत:हून विचारणारे मित्रही भेटतात.  आपल्यापेक्षा लहान असून देखील सहलीतल्या प्रत्येक ठिकाणाची माहिती सांगू शकणारा एखादा मित्र आपल्यालाही अवांतर वाचनाला प्रवृत्त करतो. सहलीत मित्राच्या वाढदिवसासाठी दोन मिनिटात सुंदरशी रांगोळी काढणारी ताई किंवा रोज नवनवीन गाणी/स्तोत्रे सांगणारा दादा पाहिला की  आपणही एखादी कला जोपासली पाहिजे असं वाटायला लागतं. रात्री सगळ्यांच्या नंतर झोपून, सकाळी सगळ्यांच्या आधी उठणारे आणि तरीही दिवसभर सगळ्यांपेक्षा जास्त काम करणारे काका-काकू बघितले की - "मन उत्साही असेल तर शरीरही न थकता साथ देतं", हे पटतं, आणि मग हे सारं पाहिलं की आपल्याही नकळत बदल घडून येतात. 

"मला कोणीच माझ्या सामानाला हात लावलेलं आवडत नाही", असं म्हणणारी मुलगीच पुढच्या सहलीत स्वत:हून आपल्याकडचं जास्तीचं पांघरूण कोणाला हवंय का असं विचारते. यंदा आपण मला दोन ऐवजी एकच नवा ड्रेस घेऊन, उरलेले पैसे देवबांधच्या 'भाऊबीज निधी'ला पाठवूयात का, असं कोणीतरी आई-बाबांना सुचवतो. "काका, पुढची सहल कुठे जाणार ते सांगा, म्हणजे मी माहिती गोळा करून ठेवतो", असं कुणीतरी म्हणतं, तर "काकू, या वेळी रोज सकाळी सगळ्यांना बिस्किटे देण्याचं काम मी करणार हं", असंही कुणीतरी म्हणतं. 

हे सगळं घडतं याचं कारण - माणसाचं मन हे टीपकागदासारखं असतं. दिसतं ते टिपून घेणारं. म्हणूनच जर आपलं मन अधिकाधिक संवेदनशील बनवून, एक परिपूर्ण व्यक्ती बनायचं असेल, तर हा असा सहलीचा अनुभव हवाच...   

Saturday, March 26, 2011

केल्याने देशाटन -२ ...

'स्वामी' कादंबरीत माधवराव रमाबाईंना म्हणतात - "ओहोटीच्या वेळी मोकळ्या पडलेल्या किनाऱ्यावर जेव्हा समुद्र-खेकडे रांगोळ्या घालू लागतील, तेव्हा तुझा अभिमान पार धुऊन जाईल आणि तू कौतुकानं त्यांनी रेखाटलेल्या कलाकृती बघत राहशील. " असंच आपलं  खुजेपण आणि निसर्गाचं श्रेष्ठत्व पदोपदी जाणवत राहतं. अथांग सागर अंत:करणाची विशालता देतो, तर डोंगरावरून कोसळणारा धबधबा इतरांसाठी जीव झोकून द्यायला शिकवतो. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीवेळेला सारखाच रंग धारण करणारा सूर्य "संपत्तौ च विपत्तौ च महताम् एकरूपता " हे दाखवून देतो. शिंपल्यातून अचानक बाहेर येणारी गोगलगाय जशी दचकायला लावते, तसाच समुद्रात लाटेमुळे "पायाखालची वाळू सरकणे", या वाक्प्रचाराचा प्रत्यक्ष येणारा अनुभव हृदयाचा ठोका चुकवतो. 

 इतिहासाच्या माध्यमातून भेटणारी माणसंही असंच खूप काही शिकवून जातात. हिरकणी बुरुजावरून खाली डोकावून पाहिलं की आजही आपले डोळे फिरतात. मग अशा जागेवरून अंधारात, जंगलात उतरण्याचं धाडस करणाऱ्या हिरकणीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो. गड बांधण्याच्या कामगिरीवर खुश होऊन शिवाजी महाराजांनी बक्षीस देऊ केले असता, पायरीच्या दगडावर "सेवेचे ठायी तत्पर, हिराजी इंदूलकर ", असे लिहिण्याची परवानगी मागणारा हिराजी निरपेक्ष सेवेचा उत्तम आदर्श घालून देतो. "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं" असं सांगणारा तानाजी मालुसरे राष्ट्रहित महत्वाचे असल्याचा संदेश देतो, तर राजे सुखरूप गडावर पोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत सिद्दी जौहर आणि यमराज दोघांनाही घोडखिंडीत थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे असीम कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण बनून राहतात. आणि हा असा  त्या त्या जागी जाऊन इतिहासाचा पुन:प्रत्यय घेण्याचा प्रयत्न केला की मग हे केवळ पुस्तकी दाखले न राहता, जीवनपथावर पदोपदी मार्गदर्शक ठरणारे प्रसंग बनतात. शिवाय पुस्तकातला इतिहास जणू सजीव झाल्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.      
   
पण केवळ इतिहासातच चांगली माणसं होऊन गेलीत असं थोडंच आहे. आजही आपल्याभोवती अशी अनेक माणसं आहेत, की ज्यांच्याकडून आपल्याला खूप शिकायला मिळू शकतं. अशाच काहींच्या भेटीचा योग सहलीच्या निमित्तानं येतो - मग ते आयुकाचे विज्ञान प्रसार अधिकारी डॉ. अरविंद परांजपे असतील, वा आपल्या कथाकथनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे सु. ह. जोशी असतील. श्रोत्यांना आपलंसं करून घेणं, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सारखंच महत्त्व देणं, या अशांच्या वैशिष्ट्यांमुळे नकळत आपणही ते गुण उचलतो. आपलं पद, प्रतिष्ठा यांचा विचार न करता इतरांबरोबर समरस होऊन राहणारी माणसं सहलीत बघायला मिळतात. एकदा आम्ही कोकणातला एक कौलांचा कारखाना बघायला गेलो होतो. कारखाना बघताना एक काका  आम्हाला कारखान्याची माहिती देत होते. त्या कारखान्यात नोकरी करणाऱ्यांपैकीच  ते असावेत असा आमचा अंदाज होता. संपूर्ण कारखाना बघून झाल्यानंतर आम्हाला कळलं, की ते त्या कारखान्याचे मालक श्री. जोगळेकर होते. आता एवढ्या मोठ्या उद्योगाचा मालक दीड - दोन तास आपल्याशी गप्पा मारत फिरत होता, ही गोष्ट खूपच धक्कादायक होती. तशीच गोष्ट महाबळेश्वरच्या श्री. आगरकरांची. त्यांच्या मधुमक्षिका पालन केंद्रात आम्ही गेलो असता, मधमाश्यांच्या प्रकारांपासून ते मधाच्या प्रकारांपर्यंत साऱ्या प्रक्रियेची माहिती त्यांनी अतिशय साध्या शब्दांत आणि उत्साहानं दिली. ही अशी माणसं भेटली, की "विद्या विनयेन शोभते", या सुवचनाची सत्यता पटते. 

या थोरामोठ्या मंडळींप्रमाणेच, आजूबाजूची सामान्य माणसं आणि इतकंच नव्हे, तर आपली मित्रमंडळी देखील नकळतपणे खूप काही देऊन जातात. त्यांच्याबद्दल बोलूयात, पुढच्या भागात. 

Sunday, March 6, 2011

केल्याने देशाटन - १ ...

"केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
लहानपणापासून अनेकदा ऐकलेली, वाचून - ऐकून अगदी पार गुळगुळीत झालेली ओळ. पण या ओळींची सत्यता अनुभवली ती मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या 'मातृभूमी दर्शन' उपक्रमातून. फ्रान्सीस बेकन देखील म्हणतो - 
"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."  
म्हणूनच प्रवास, त्यातही समवयस्कांच्या समूहासोबत केलेला प्रवास हा शिक्षणाचा एक भागच आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनादेखील अनुभवसमृद्ध करणारा गुरु आहे.

अशा या नियोजनबद्ध सहलीचा सर्वात प्रमुख फायदा म्हणजे त्यातून लागणारी स्वयंशिस्त. एरवी घरात आईच्या प्रत्येक हाकेला, दोन मिनिटांत उठतो असं उत्तर देत उठायला अर्धा-अर्धा तास लावणारेही गाडी निघून जाईल या भीतीनं कोणीही हाक न मारताच साडेपाचलाच उठून बसतात. शिवाय उठल्यावर अंथरुणात रेंगाळत न बसता पटकन आवरायला सुरुवात करणं, अंघोळ लवकर उरकणं, या सवयी इथंच पहिल्यांदा जडतात. आपलं सर्व सामान रोजच्या रोज जागच्या जागी ठेवणं, वस्तू सांभाळून न हरवता वापरणं या छोट्या छोट्या सवयी पुढे खूप उपयोगी पडतात.

सहलीतनं अंगी बाणणारा आणखी एक गुण म्हणजे स्वावलंबन. आजच्या हम दो - हमारे दो / एक च्या  जमान्यात, शाळेत जाताना डबा- waterbag भरण्यापासून ते बुटाची लेस बांधून देण्यापर्यंत आई- बाबा मदतीला असतात.  त्यामुळे जेवण झाल्यावर आपलं ताट उचलून ठेवणं, आपल्या अंथरूण-पांघरुणाची घडी घालणं, या गोष्टीसुद्धा अनेकांना अवघड जातात. पुढच्या आयुष्यात होस्टेलवर राहायचं झालं की याच सवयी उपयोगी पडतात.

एवढंच नाही, तर बिना बोर्नविटाचे दूध पिणं, नावडती भाजी कुरकुर न करता खाणं, यासारख्या गोष्टी शिकायला तर सहलीशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तीन तास सिंहगड चढून, फिरून कडकडून भूक लागली की मग पानातली कोणतीही भाजी अगदी अमृतासारखी गोड लागते. शिवाय मित्र-मैत्रिणींच्या गप्पांची जोड कोणत्याही पदार्थाची चव अधिकच रुचकर बनवते. त्यामुळेच साधी ग्लुकोजची  बिस्कीटेसुद्धा  आवडीनं खाल्ली जातात. अनेक नवनवे पदार्थ खायला मिळाल्यानं आपल्या खाद्यज्ञानात  भरपूरच भर पडते. रंगामुळे सुरुवातीला विचित्र वाटणारी सोलकढी किंवा नाचणीची भाकरी, यांनादेखील आपल्या मनात आवडीची जागा मिळते. मालवणी खाजा, कर्नाटकातला सेट डोसा असे वेगवेगळ्या प्रांतातले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मनात कायमचे घर करून राहतात. रुमाली रोटी सारखा प्रकार अनेकांनी खाल्लाही नसेल, पण आम्हाला सहलीत तो खायला तर मिळालाच, पण त्याचबरोबर हवेत वरचेवर झेलत सुन्दरशी रुमाली रोटी बनवण्याचं बल्लावाचार्यांचं कौशल्यही  तिथं पाहायला मिळालं.

हे झालं खाद्यपदार्थांचं. पण त्याचबरोबर जी फळं आपण नेहमी खातो, जे जॅम वापरतो , त्या फळांची झाडं, फळप्रक्रिया केंद्रं बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातल्या नारळी-पोफळींच्या बागांची वर्णनं, नेहमीच पुस्तकात वाचलेली असतात. फळाबाहेर बी असणारा एकमेव झाड म्हणजे काजू हे सामान्यज्ञानाच्या पुस्तकात असतं. ते बघायला मिळतं, ते कोकणच्या सहलीतच. करवंदांच्या जाळीत हात घालून करवंद तोडण्यात वेगळीच मजा असते. सागरगोटेसुद्धा झाडाला लागतात हे मला तर सहलीत गेल्यावरच कळलं. सिंधुदुर्ग किल्ल्यातलं फांदी असलेलं नारळाचं झाड, समुद्रात असूनसुद्धा गोड पाणी देणाऱ्या दूध, दही, साखर बाव या विहिरी अजूनही जशाच्या तशा आठवतात. रायगडावरून पहाटे पाहिलेलं इंद्रधनुष्य, धुक्यात लपेटलेला सह्याद्री पर्वत आणि हे सगळं बोचऱ्या थंडीत अनुभवताना मध्येच झालेला हलक्या सरींचा शिडकावा आठवला की आजही अंगावर रोमांच उभे राहतात.

हे सगळं झालं निसर्गानं दर्शन घडवलेल्या दृश्यांबद्दल. पण हा निसर्ग निर्जीव नाहीये. तो आपल्याला खूप काही शिकवतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू....